Header Ads

ad

सर्दी-खोकल्याच्या साथीमुळे करोना चाचणीही पॉझिटिव्ह, 'या' जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढली

औरंगाबाद : केवळ तीन दिवसांत जिल्ह्यात करोनाचे दुप्पट रुग्ण आढळून आले आहेत; तरीही बहुतांश करोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि फार कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज दिसून येत आहे. त्यामुळे हा विषाणू 'डेल्टा' की 'ओमायक्रॉन' अशी शंका घेतली जात आहे. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 'ओमायक्रॉन'चे दोनच रुग्ण आढळून आले आहेत आणि केवळ लसीकरण व पूर्वी करोना होऊन गेल्यामुळेच लक्षणे सौम्य जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे साहजिकच सक्रिय रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. २९ डिसेंबर रोजी १६ नवे बाधित व ५७ सक्रिय रुग्ण, ३० डिसेंबर रोजी १६ नवे बाधित व ६१ सक्रिय, ३१ डिसेंबर रोजी १८ नवे बाधित व ६६ सक्रिय, एक जानेवारी रोजी २६ नवे बाधित व ७३ सक्रिय, तर रविवारी (२ जानेवारी) ३५ नवे बाधित व ८३ सक्रिय रुग्ण झाले आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या तीनच दिवसांत बाधित रुग्ण दुप्पट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, बहुतांश बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. या संदर्भात फिजिशियन्स असोसिएशनचे शहर सचिव डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, सध्या सर्दी-खोकला-तापेचे रुग्ण खूप वाढले आहेत आणि अशा रुग्णांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे (लंग इन्व्हॉल्मेंट) अशी पूर्वी दिसलेली गंभीर लक्षणे सध्या तरी नाहीत, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. लसीकरणामुळेच लक्षणे सौम्य सर्दी-खोकल्याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत आणि त्यांची करोना चाचणी केल्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह येत आहे. मात्र, लसीकरणाचे दोन्ही डोस होऊन गेल्यामुळे आणि पूर्वी करोना होऊन गेलेल्यांमध्ये लक्षणे सौम्य आहेत, हे आधी लक्षात घेतले पाहिजे, असे अतीव दक्षता तज्ज्ञ डॉ. आनंद निकाळजे यांनी सांगितले. घाटीतून ९५८ नमुने 'एनआयव्ही'त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) आतापर्यंत ९५८ सँपल पाठवले आणि त्यातील संशयित ३५० नमुन्यांपैकी केवळ दोन रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याचे घाटीत नव्याने उपलब्ध झालेल्या मशीनवर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झाले. 'एनआयव्ही'नेदेखील दोनच रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याची खात्री केली व ते जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत तरी ओमायक्रॉनचे दोनच रुग्ण असल्याचे म्हणता येईल, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. केवळ लसीकरणामुळेच लक्षणे सौम्य जाणवत आहेत. मात्र लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ, व्याधीग्रस्त (कोमॉर्बिड) व्यक्तींना आणि दोन्ही डोस न घेतलेल्यांनाही धोका कायम आहे. त्यामुळे ज्येष्ठ, व्याधीग्रस्त व मुलांना बाधित होण्यापासून जपणे आवश्यक आहे. खरे तर लक्षणे असलेल्या अनेक व्यक्ती सध्या चाचणीच करत नसल्याने बाधितांचे आकडे कमी असू शकतात व येत्या काही दिवसांत आकड्यांचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. -डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी मागच्या तीन-चार दिवसांत करोनाबाधितांची संख्या खूप जास्त दिसून येत आहे व लग्न-समारंभ-कार्यक्रम आदी कारणांमु‌ळ‌े ही संख्या अचानक वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे चाचण्या वाढवणे व दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून काटेकोरपणे 'होम आयसोलेशन'मध्ये राहणे आता खूप गरजेचे असणार आहे. सीटी-स्कॅन, स्टेरॉईड्स यासारख्या अनावश्यक चाचण्या-औषधोपचार टाळणे व गरजेपुरतीच औषधे घेणे गरजेचे आहे. -डॉ. आनंद निकाळजे, अतीव दक्षता तज्ज्ञ


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qIt1CL

No comments