'जनता कर्फ्यू' सुरू! मुंबई-ठाण्यासह राज्यात 'संचार' बंद
मुंबई: करोना व्हायरसने देशातही हाहाकार उडवल्याने करोनाला पायबंद घालण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता यावी म्हणून आज संपूर्ण देशात पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज मध्यरात्रीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात मध्यप्रदेश आदी आठ राज्यांच्या आंतरराज्य एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच गो एअर त्यांच्या सर्व सेवा बंद ठेवणार आहे. अन्य कंपन्याही काही उड्डाणे रद्द करणार आहेत. यामुळे मुंबईहून २०० हून अधिक विमाने रद्द होणार आहेत. शिवाय राज्यातील सर्वच शहरातील बाजार पेठाही बंद राहणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवेवरील कर्मचारी सोडून सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे तपासून स्टेशनवर सोडण्यात येणार असून अन्य प्रवाशांना स्टेशनबाहेरच रोखण्यात येईल, असे कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सर्व रेल्वेस्थानकांवर पूर्व व पश्चिम बाजूंकडील मुख्य प्रवेशद्वारांवर पथकं नेमण्यात येणार आहेत. या पथकांत एक जीआरपी, एक रेल्वे पोलीस, महसूल विभागाचे दोन प्रतिनिधी व एक वैद्यकीय कर्मचारी असेल. हे पथक खात्री करूनच प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर प्रवेश देईल, असे दौंड यांनी स्पष्ट केले.
२०० उड्डाणे रद्द जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर गो एअर आज दिवसभरात एकही विमान उडवणार नाही. गो एअरची मुंबईहून दररोज जवळपास १३० उड्डाणे असतात. ती सर्व रद्द होती. विमान तिकीट रद्द होऊन त्याचे पैसे प्रवाशांना परत मिळण्याबाबत कंपनीकडून प्रवाशांशी संपर्क साधला जात आहे. इंडिगो एअरलाइन्सने ४० टक्के उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अती गर्दीच्या व अत्यल्प गर्दीच्या उड्डाणांचा समावेश आहे. गर्दी टाळण्यासाठी अती गर्दीच्या सेवा बंद असतील. साधारण गर्दी (५० ते ७० टक्के भार) असलेली उड्डाणे सुरु असतील. त्याअंतर्गत मुंबईहून सुमारे ३५ उड्डाणे रद्द होत आहेत. स्पाइसजेट, एअर विस्तारा व एअर आशिया या कंपन्यांनीही काही देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या मुंबईहून सुटणारी जवळपास ४० उड्डाणे याअंतर्गत रद्द होत आहेत. दरम्यान सरकारी एअर इंडियाने मात्र त्यांचे देशांतर्गत विमानसेवांचे वेळापत्रक नियमित सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अलायन्स एअर या विमानसेवेचाही समावेश आहे. 'उडान' अंतर्गत असलेल्या अन्य छोट्या विमानसेवा कंपन्यांनी प्रवासीसंख्या पाहून त्यानुसार सेवा सुरू अथवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराज्य एसटी सेवा बंद दरम्यान, कालपासूनच राज्यातील विविध भागात जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवल्या. तर अनेक शहरात सकाळपासूनच मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर तीन दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ukzmny
Post a Comment