नगर जिल्ह्यातील कोपर्डीत पुन्हा मूक मोर्चा, हे आहे कारण
अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डीत पुन्हा एका आंदोलने सुरू झाली आहेत. उपोषणानंतर आता मूक मोर्चाही काढण्यात आला. या गावातील समाधान शिंदे या तरुणाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यासह विविध संघटनांतर्फे आंदोलने सुरू आहेत. येथील समाधान शिंदे यांच्यावर ट्रॅक्टर चोरीचा खोटा संशय घेऊन त्याना मारहाण करण्यात आली. घाबरल्यामुळे आणि आरोप सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. बाळू शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गणेश नारायण मोरे, धनंजय बबन गुंड व काका ज्ञानदेव सुद्रिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दहा नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे कुटुंबीय आणि नातलगांनी घरासमोरच उपोषण केले. शिंदे कुटुंबीय व कोपर्डीतील बौद्ध समाजाच्या वतीने उपोषण करण्यात आले. आंदोलनात समाधान यांचे पक्षाघात झालेले वडील रमेश शिंदे, वयोवृद्ध आई ताराबाई, पत्नी रंजना दोन चिमुकली मुले, भाऊ बाळू शिंदे यांच्यासह गावातील बौद्ध समाजाचे नागरिक सहभागी झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मयत समाधान शिंदे यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत द्यावी व आरोपींना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या घटनेमुळे समाधान शिंदे याचे सर्व कुटुंब उघड्यावर आले आहे. तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला मात्र अद्याप दोन आरोपी मोकाट आहेत. या आरोपींना तात्काळ अटक करावी व शिंदे यांच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शिंदे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यापूर्वी देखील कोपर्डी गाव देशात गाजले होते. आम्ही शांतता मानणारे कार्यकर्ते आहोत. यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन पोलीस व प्रशासनाने उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही सुनील साळवे यांनी दिला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35Lx6g1
Post a Comment