Header Ads

ad

शेतकरी दिन अन् आंदोलन: नेत्यांची ट्विटरवर जबरदस्त टोलेबाजी

म.टा. प्रतिनिधी, नगर: आज आहे. देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस (२३ डिसेंबर) शेतकरी दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. आज हा दिन साजरा केला जात असतानाच देशातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याचा संदर्भ देत राज्यातील काही नेत्यांनी केंद्र सरकारविरूद्ध टोलेबाजीही केली आहे. अनेक नेत्यांनी भल्या सकाळीच शेतकरी दिनाची दखल घेत ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना आणि शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.’ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काव्यओळींतून आपल्या भावना व्यक्त करीत टोलेबाजी केली आहे. ‘देश आर्थिक मंदीत सरकार आपल्याच धुंदीत शेतकरी कडाक्याच्या थंडीत अशा स्थितीत आजच्या 'राष्ट्रीय किसान दिना'ला शेतकरी कसा असेल आनंदित?’ असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे, ‘देशभर शेतकरी बांधव शेती कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. आजच्या राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त केंद्र सरकारने संवेदनशीलतेने शेतकऱ्यांसोबत चर्चा करून आपल्या अन्नदात्याच्या मागण्या पूर्ण कराव्यात. याच शेतकरी बांधवाना शेतकरी दिनाच्या शुभेच्छा ठरतील.’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे, ‘जगाचा पोशिंदा, अन्नदाता बळीराजा गेल्या एक महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर रक्त गोठावणा-या थंडीत आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. आज शेतकरी दिवशी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प करूया.’ राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे, ‘आज राष्ट्रीय शेतकरी दिन! मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाचे आभार मानण्याचा आजचा हा दिवस! या निमित्ताने आपल्या अन्नदात्या बळीराजाला सामाजिक, आर्थिक स्थैर्य व शांती लाभावी याच सदिच्छा.’ भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे, ‘आसमानी सुलतानी संकटांना धीराने तोंड देत उभ्या असलल्या बळीराजाला शेतकरी दिनी शुभेच्छा.’ भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही आणि देश जगेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे, ‘मातीतून सोने पिकवणाऱ्या बळीराजाचे आभार मानण्याचा आजचा विशेष दिवस. भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीचा पाया असलेल्या बळीराजाला सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.’ नेत्यांसोबत नेटकऱ्यांनीही शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3axTvR3

No comments