Header Ads

ad

देशात लस तुटवडा; अजित पवारांची प्रथमच केंद्र सरकारवर टीका

पुणे : देशभरात वाढणाऱ्या करोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आता लसीकरणावर () भर देण्यात येत आहे. मात्र याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा (NCP criticizes Modi Government) साधला आहे. 'सुरुवातीच्या काळात तयार होणारी लस बाहेरच्या देशांना गरज नव्हती. इतर देशांना लसींचा पुरवठा केल्याने आपल्याकडे आता कमतरता भासत आहे,' अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. करोना संसर्ग होऊ नये म्हणून राज्यात नागरिकांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लावल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावं लागत आहे. याच मुद्द्यावरून अजित पवार यांनी पुण्यात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करतानाच 'सीरम इंस्टिट्यूट'चे आदर पुनावाला यांच्यावर नाराजी व्यक्त केली. 'महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केला जाईल, असा शब्द सुरुवातीच्या काळात आदर पुनावाला यांनी दिला होता. मात्र नंतर इतका पुरवठा करणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. पुनावाला यांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी होती,' असं अजित पवार म्हणाले. 'महाराष्ट्र करोनावर मात करणार' महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर पुण्यात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील करोना स्थितीवर भाष्य केलं. 'करोना संकटाविरुध्द राज्य एकजुटीने, निर्धाराने लढत आहे. करोनाच्या संकटकाळात राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचवण्याला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने नाईलाजाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्वांची एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच करोनावर मात करेल,' असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 'रुग्णसंख्या घटत असल्याचे शुभसंकेत' 'राज्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचेही नियोजन करण्यात आले आहे. या वयोगटातील राज्यातील ६ कोटी लोकसंख्या लक्षात घेऊन दोन्ही डोस विचारात घेऊन १२ कोटी डोसचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत अर्थ विभागाने आर्थिक नियोजन केले आहे. लसीकरणासोबतच ऑक्सिजन पुरवठा, बेड व्यवस्थापन, रेमडिसीवीर उपलब्धता, औषधांचा पुरवठा यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. साखर कारखान्यांनाही राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मितीबाबत आवाहन केले आहे. ऑक्सिजन प्लँट उभारुन ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यावर राज्य शासनाचा भर आहे, तसेच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत आहेत. हे रुग्णसंख्या घटत असल्याचे शुभसंकेत आहेत,' असंही अजित पवार यावेळी म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eJpxK7

No comments