अवघ्या ६ तासांत कुटुंब संपलं, वडिलांच्या मृत्यूनंतर मायलेकांनीही सोडले प्राण
अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यात तेरा दिवसांपूर्वी वडील तर आई पाठोपाठ आणि यवतमाळ इथं उपचार घेणाऱ्या मुलाचा केवळ सहा तासांच्या फरकाने करोनामुळे मृत्यू झाला. ही हृदय हेलावणारी घटना तालुक्यातील कासारखेडा इथं घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देविदास देशमुख (७०) यांचे तेरा दिवसांपुर्वी निधन झाले तर बुधवारी सायंकाळी छबुबाई देविदास देशमुख (६७) व त्याच रात्री दोन वाजता विजय देशमुख (४८) यांचा मृत्यू झाला. करोनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सोनगाव खर्डा इथं दोन चुलत भावांचा एकाच दिवशी करोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी एकजण नागपूर तर दुसरा अमरावती इथं उपचार घेत होता. मागील पंधरा दिवसात करोना रुग्णांचा चढता आलेख पाहता पंधरा वर्षांआतील रुग्णात होणारी झपाट्याने वाढ सोबतच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने करोना आजाराला सहज घेणे जीवावर बेतत आहे. करोना चाचण्या वाढावाव्यात तसेच प्रत्येकाने चाचणी करून घेण्यासाठी तहसीलदार गौरवकुमार भळगाठीया आग्रह करीत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर हे गावागावात चाचणी शिबिरे घेत आहे. शहरात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी प्रत्येक चौकात चाचणी कॅम्प लावला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yPE7Jd
Post a Comment