भाजपनं गड राखला; मंगला अंगडी ठरल्या बेळगावच्या पहिल्या महिला खासदार
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: शेवटच्या फेरीपर्यंत प्रचंड चुरशीच्या ठरलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत अखेर भाजपने आपला गड राखला. भाजपच्या यांनी काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा ५२४० मतांनी पराभव केला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी एकाकी झुंज देत तब्बल १ लाख १७ हजार यावर मते मिळवली. () केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे सप्टेंबर मध्ये निधन झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपने अंगडी यांच्या पत्नी मंगला यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने सतीश जारकीहोळी यांना मैदानात उतरवले होते. महिनाभर अनेक दिग्गज प्रचारात उतरल्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने अतिशय ताकतीने ही निवडणूक लढवल्याने चुरस आणखी वाढली होती. अठरा लाखांवर मतदार असलेल्या या मतदारसंघात दहा लाखांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी आठ वाजता बेळगाव येथील आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत काँग्रेसच्या जारकीहोळी यांनी आघाडी घेतली. त्यानंतर काही फेरीतच त्यांची आघाडी मोडून काढत अंगडी यांनी आघाडी घेतली. त्यानंतर दिवसभर सायंकाळपर्यंत झालेल्या ८७ फेरीमध्ये सतत अनेकदा कधी अंगडी तर कधी जारकीहोळी आघाडी घेत होते. त्यामुळे निवडणूक निकालाची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत ताणली गेली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी चांगली मते घेतल्यामुळे ही चुरस वाढली होती. शेवटी अंगडी यांनी ५२४० मतांनी विजय मिळवला. या विजयासाठी मात्र भाजपला काँग्रेस बरोबर शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. भाजपच्या हक्काची मते एकीकरण समितीला पडल्यामुळेच भाजपला हा संघर्ष करावा लागला. या निवडणुकीत दहा हजारांवर मतदारांनी नोटाला मतदान केले. उमेदवारांना पडलेली मते अशी मंगला अंगडी- ४४०३२७ सुरेश जारकीहोळी- ४३५०८७ शुभम शेळके- ११७१७४
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RgviHp
Post a Comment