Header Ads

ad

ठाणे, पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढचे तीन तास महत्वाचे

मुंबईः राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. बंगलच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ( Update) पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांवर तीव्र ढग जमा झाल्यानं मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासोबत विजांचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी नगर, मराठवाडा, विदर्भ, खानदेश असा सर्वदूर पाऊस झाला. नगरमध्ये पाथर्डी, शेवगावसह नगरच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पाझर तलाव फुटले असून, खान्देश-मराठवाडा जोडणाऱ्या औट्रम घाटात दरडी कोसळल्या आहेत. जळगाव-औरंगाबाद महामार्गावरही पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प आहे. विदर्भातही सर्वदूर पाऊस झाला आहे. चाळीसगाव आणि वणी तालुक्यात मिळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातील ६३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक कलाबाई पांचाळ यांचा पुरात बुडून मृत्यू झाला. तसेच, पिंपरखेड परिसरात नदीच्या पुरात एक अनोळखी मृतदेह आढळला आहे. या पुरात शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jvcijZ

No comments