कोल्हापुरातील टोलविरोधी लढ्याचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे यांचं निधन
म .टा .प्रतिनिधी । कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील अनेक सामाजिक व विधायक कार्यात पुढाकार घेणारे आणि थेट पाईपलाईन, हद्दवाढीसह अनेक प्रश्नावर लढा देणारे टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवासराव श्रीपतराव साळोखे यांचे मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते ७१ वर्षाचे होते. राज्यभर गाजलेल्या कोल्हापुरातील टोलविरोधी लढ्याचे निमंत्रक असलेल्या साळोखे यांना तात्या नावाने ओळखले जात होते. विद्यार्थीदशेपासून सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या साळोखे यांनी शहरात काँग्रेसच्या बळकटीसाठी बरीच वर्षे काम केले. तेव्हापासूनच ते विविध सामाजिक कामाबरोबरच शहराच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांचे नेतृत्व करू लागले. कोल्हापुरात झालेले टोलविरोधी आंदोलन हे राज्यभर गाजले. त्याचे तात्या निमंत्रक होते. स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तात्यांनी हे आंदोलन यशस्वी केल्यामुळे सरकारला माघार घेत टोल रद्द करावा लागला. ते बालगोपाल तालमीचे फुटबॉल खेळाडू व गेले पस्तीस वर्षे तालमीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वाचा: गेले काही दिवस आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचे निधन झाले. सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jAYIvD
Post a Comment