किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी अखेर मागे; मंगळवारी कोल्हापुरात दाखल होणार!
कोल्हापूर : नेते आणि माजी खासदार (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांच्यावरील जिल्हाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या हे मंगळवारी सकाळी ११ वाजता कोल्हापुरात येत असून भाजपच्या वतीने त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. किरीट सोमय्या हे २० सप्टेंबरला कोल्हापुरात येणार होते. पण राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. आता मंगळवारी पुन्हा ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदीचा आदेश मागे घेतला आहे. पोलिसांचा गोपनीय अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्षाने सोमय्या यांच्या दौऱ्याला विरोध न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यांचे स्वागत करा, संयम पाळा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. सोमय्या हे मंगळवारी सकाळी ११ वाजता कोल्हापुरात येत असून त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेदेखील असतील. ताराराणी चौकात भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते अंबाबाईचे दर्शन घेऊन मुरगूडला पोलिसात फिर्याद देण्यासाठी जाणार आहेत. सायंकाळी चार वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे. त्यानंतर आठ वाजता ते महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटलेले किरीट सोमय्या जिल्ह्यात येणार असल्याने जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XRjRcu
Post a Comment