विखे पाटलांना न विचारता भाजपच्या कार्यक्रमासाठी शरद पवारांना आमंत्रण
अहमदनगर: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या (दोन ऑक्टोबर) नगरमध्ये एकाच व्यासपीठावर येत आहेत. मात्र, या कार्यक्रमाचे संयोजन भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडे आहे. पवार-विखे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रृत असल्याने या कार्यक्रमातील दोघांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पवार यांना गडकरी यांच्याकडूनच थेट निमंत्रण देण्यात आलेले आहे. विखे पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित अन्य कार्यक्रमाला पवारांना निमंत्रित करण्यात आलेले नाही, असेही खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले आहे. गडकरी यांचे आगमन हेलिकॉप्टरने होणार असून ते विखे यांच्या संस्थेतील हेलिपॅडवर उतरणार आहे, तर पवार मोटारीने पुण्याहून थेट कार्यक्रमस्थळी येणार आहेत. केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या चार महामार्गांचे भूमिपूजन आणि काम पूर्ण झालेल्या चार रस्त्यांचे लोकार्पण शनिवारी सकाळी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. खासदार डॉ. यांनी या कार्यक्रमासंबंधी पत्रकारांना माहिती दिली. या कामासोबतच गडकरी नगर जिल्ह्याच्या विकासासंबंधी आणखी काही घोषणा करणार आहेत. त्यांच्याकडे आणखी काही मागण्या करण्यात येणार असल्याचेही विखे यांनी सांगितले. वाचा: मात्र, या कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष लागले आहे ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीकडे. पवार यांना गडकरी यांच्या सूचनेनुसार निमंत्रण गेले. त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. पुण्याहून मोटारीने ते थेट कार्यक्रमच्या ठिकाणी येणार असून तो कार्यक्रम करून पुन्हा पुण्याला जाणार आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. तर गडकरी यांचे आगमन हेलिकॉप्टरने विळद घाटातील विखे पाटील फाऊंडेशनच्या हेलिपॅडवर होणार आहे. तेथे ते मुख्य कार्यक्रमाला येणार आहेत. त्यानंतर विखे यांनी आयोजित केलेल्या अन्य कार्यक्रमांना गडकरी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पवार मात्र उपस्थित राहणार नाहीत, असे डॉ. विखे यांनी सांगितले. भूमिपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाचे नियोजन केंद्रीय रस्ते विकास महामंडळ आणि भाजपतर्फे केले जात आहे. यामध्ये खासदार म्हणून डॉ. विखे यांची भूमिका महत्वाची असली तरी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी विखे यांच्या आधीच पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची घोषणा केली. तर जिल्हा स्तरावरचे बाकीचे नेते डॉ. विखे यांच्यासोबत उपस्थित होते. यावरून पक्षातही समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या राष्ट्रवादीचे सहा आमदार जिल्ह्यात आहेत. राजकीयदृष्ट्या पवार नगरला महत्त्व देतात. अनेक महत्वपूर्ण घोषणा आणि निर्णय त्यांनी नगरमध्ये जाहीर केलेले आहेत. अर्थात विखे पाटील यांच्यासोबत त्यांचे पूर्वीपासूनच पटत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे यांना उमेदवारी देण्याचा विषय प्रतिष्ठेचा झाला होता. शेवटपर्टंत पवार राजी न झाल्याने विखे यांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचीही उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली. ही निवडणूकही पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. अखेर डॉ. विखे यांचाच विजय झाला. प्रचार काळात एकमेकांवर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर विखेंच्या संयोजनाखालील कार्यक्रमास पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांना आपण नव्हे तर गडकरी यांच्याकडूनच थेट निमंत्रण गेल्याचे विखे सांगत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस जिल्ह्यात होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय कर्जत-जामखेडमध्ये यापूर्वीच भाजपमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर राहुरीतही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांमध्ये डॉ. विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि राम शिंदे यांच्या समर्थकांचा समावेश आहे. अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे. अर्थात हा राजकीय कार्यक्रम नाही, राजकीय भाष्य त्यामध्ये केली जाण्याची शक्यता कमीच असली तरी पवार आणि विखे यांच्याकडून सूचक वक्तव्य केली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीच जवळीक वाढत आहे. कालच त्यांनी दिल्लीत मोदी यांची पुन्हा भेट घेतली. यावेळी काय चर्चा झाली, त्याचा तपशील सांगण्यात आलेला नाही. गेल्या महिन्यातही विखे यांनी मोदी यांची भेट घेतली होती. केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर दोन वेळा अशी भेट झालेली आहे. सहकार मंत्रालयावरून विखे यांनी अनेकदा पवारांवर टीका केलेली आहे. या कार्यक्रमात त्यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F7rLQ1
Post a Comment