पालघर जिल्हा पहाटे हादरला; अनेक भागांत भूकंपाचे धक्के
पालघर: महाराष्ट्रातील जिल्ह्यात आज, रविवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी नोंदवण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. जिल्हा आपत्ती विभागाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यात पहाचे ५.३५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी नोंदवण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ पासून विशेषतः तलासरी तालुक्यातील दुंदलवाडी गाव आणि डहाणू तालुक्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के अनेकदा जाणवले आहेत. परंतु आज, रविवारी दोन महिन्यांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी जूनमध्येही जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भागात भूकंपाचे लागोपाठ दोन हादरे बसले होते. या धक्क्यांमुळं काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे नागरिकही घाबरले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी नोंदवली गेली होती. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, कासा, चारोटी, कवाडा या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून अधूनमधून भूकंपाचे धक्के बसत आहेत. वारंवार होणाऱ्या भूकंपांचा शास्त्रीय अभ्यास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने या भागातील सरकारी कार्यालये, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांचे मजबुतीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JirLPf
Post a Comment