Header Ads

ad

लॉकडाऊननंतर रिअल इस्टेट क्षेत्राची बक्कळ कमाई, तिजोरीत भरघोस महसूल जमा

औरंगाबाद : करोनाचे संकटामुळे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार काहीसे थंडावले होते. रिअल इस्टेट क्षेत्रावरही त्याचा परिणाम झाला होता, परंतु गेल्या काही महिन्यात रिअल इस्टेट क्षेत्र पूर्वपदावर येत असून नोंदणी व मुद्रांक विभागात ऑक्टोबरअखेर तब्बल ८९ हजार ९५ दस्त नोंदणी झाली आहे. यातून ३८१ कोटींचा महसूल शासन तिजोरीत जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. येथील नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उप नियंत्रक विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्याचा समावेश आहे. विभागाला यंदा ८४० कोटींच्या महसूलवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात औरंगाबादला ४४० कोटी रुपये, जालन्याला २५० कोटी रुपये तर, बीड जिल्हा कार्यालयास १५० कोटी रुपये महसूल संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात ऑक्टोबरअखेर औरंगाबाद जिल्ह्यातून २३८ कोटी रुपये, जालन्यातून ६५ कोटी रुपये तसेच बीड जिल्ह्यातून ७७ कोटींवर असा एकूण ३८१ कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडे अद्याप चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यात चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर जालना जिल्ह्यात देण्यात आलेले २५० कोटींचे उद्दिष्ट कमी करून ते ११० कोटी रुपये करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिल ते ऑक्टोबरअखेरपर्यत विभागात एकूण ८९ हजार ९५ दस्त नोंदणी झाल्या आहेत. यात औरंगाबादेत ४१ हजार ५२४, जालना जिल्ह्यात २१ हजार ९०७, बीडमध्ये २५ हजार ६६४ दस्त नोंदणी झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षभरात ६१२ कोटींचा महसूल एप्रिल २० ते मार्च २१ या वर्षात नोंदणी व मुद्रांकच्या औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात मिळून १ लाख ६० हजारांवर दस्तनोंदणी झाली. यातून ६१२ कोटी रुपयांचा महसूल शासन तिजोरीत जमा झाला होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Jq89ZB

No comments