नागपूरकरांसाठी जमावबंदी नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला महत्त्वाचा आदेश
नागपूर : नागपूर शहर वगळता जिल्ह्यात रात्री ९ वाजता 'सबकुछ बंद'चा निर्णय जिल्हाधिकारी आर. विमला यांनी अखेर मंगळवारी जाहीर केला. शहरात हा निर्णय लागू करण्याबाबत कुठलेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत शहरातील आस्थापने निर्धारित वेळेनुसार सुरू राहणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले. ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना ९ वाजतानंतर बंद ठेवण्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रस्ताव आहे. शहरात पोलिसांकडून मात्र आस्थापना ९ वाजताच बंद करण्याचा आग्रह धरला जात असल्याची तक्रार आहे. राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार वाढतीवर असल्याचे बघून राज्य सरकारने रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातही कठोर निर्बंध लावणे गरजेचे असल्याचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत रात्री ९ वाजतानंतर शहर आणि ग्रामीणमधील दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला. या आदेशावर राज्य शासनाने नाराजी व्यक्त केली. दुकाने बंद करण्यापूर्वी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा मुद्दा उपस्थित करून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात यावर मंथन होऊन दुकाने बंदच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती. रात्री ९ वाजतापासून दुकाने बंद करण्याबाबतचा निर्णय २८ डिसेंबरपासून अमलात आणण्याची परवानगी द्यावी, असा आग्रही प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. २८पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा उल्लेख यात होता. त्यामुळे ग्रामीणमध्ये हा निर्णय लागू केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री ९ ते सकाळी ६ वाजतादरम्यान जमावबंदी असल्याने पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दुकानांमध्येही या नियमाचे उल्लंघन झाल्यास ते दुकान बंद करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला. 'नागपूरला वेगळा निर्णय कशाला?' नववर्षानिमित्त दरवर्षी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. विशेषकरून मद्याच्या पार्ट्यांचा मोठ्या प्रमाणात होतात. या पार्ट्यांसाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क विभागाने शहर आणि ग्रामीणमधील मद्यालयांना रात्री ९ वाजतापर्यंतचीच परवानगी दिली आहे. त्यामुळे ओल्या पार्ट्या रात्री ९ वाजतानंतर करता येणार नाही. या निर्णयाविरुद्ध सूर उमटला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाने जमावबंदीचे आदेश दिले. नागपूरही महाराष्ट्रातच येत असल्याने नागपूरसाठी स्वतंत्र आदेश कशाला? रात्री ९ वाजतानंतर मद्यालये बंद केली, तर मोठे आर्थिक नुकसान होईल. हा आमच्यावर अन्याय आहे. तेव्हा या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी बदल करावे, अशी विनंती नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JqBV0b
Post a Comment