यंदा तीळ-गुळ महागणार! किलो मागे 'ऐवढ्या' रुपयांनी वाढ, ऐन संक्रांतीला महागाई
हिंगोली : मकर संक्रात काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, आतापासूनच तीळ आणि तिळापासून तयार होणारे पदार्थ महागायला सुरूवात झाली आहे. सध्या तिळाचे भाव किरकोळ भाजारात १५० रूपये किलो आहेत. काही महिन्यांपूर्वी १०० ते १२० रुपये प्रति किलोने विकला जाणारा तीळ आता संक्रातीच्या तोंडावर वाढू लागला आहे. त्यामुळे यंदा तीळ-गूळ महागणार आहे. तर तीळ आत्तापासूनच विकत घ्यायचे का? असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे. तीळ दरवाढीच्या मागचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही वर्षापासून सातत्याने कमी होत चाललेला पेरा, १० वर्षापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही ना काही प्रमाणावर तिळाचा पेरा असायचा. मात्र, सध्या ही परिस्थिती गंभीर बनली आहे. हिंगोली जिल्ह्याचा एकट्याचा विचार केला तर बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तिळाचे पीक आढळून येईल. हा पेरा कमी होण्यामागचे ही काही कारणे आहेत. कारण जाणकार शेतकऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी तिळाची शेती ही मोठ्या प्रमाणावर पिकवली जात होती, तेंव्हा रासायनिक फवारण्याचा, औषधींचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे उत्पादनसुद्धा तशाच पद्धतीने निघायचे. हल्लीच्या काळात विषारी आणि परिणामी ठरणारे औषध निघाल्यामुळे याचा फटका तीळ शेतीला बसताना दिसतो आहे. कुणी तिळाचा पेरा केलाच तर शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात तण नाशक औषध फवारणी केली तर परिणाम हा या शेतीवर होताना दिसून येतो. याच बरोबर वातावरणात होत असलेला सततच्या बदलांमुळे शेतकरी हा पिकाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. आणि लागवड क्षेत्र कमी असल्यामुळे याचा परिणाम हा भाववाढीवर होत आहे. जिल्ह्यात उत्पादन कमी असल्यामुळे व्यापारी वर्ग हा गुजरात राज्यांमधून तीळ आणि तिळाचे पदार्थ मागत असतो. माहितीनुसार, गुजरातमध्ये तिळाचे उत्पादन जास्त घेतले जाते. कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना तीळ लागवडीसाठी आवाहन केले जात असते. मात्र, उत्पादन निघत नसल्यामुळे याकडे शेतकरी वर्ग पाठ फिरवताना दिसतो आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर येणाऱ्या काळामध्ये एक तीळ सात जणांना खाण्याची वेळ येणार का...? त्याचं बरोबर तिळाचे पदार्थ आपल्या आहारातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. तीळ आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी सुद्धा आहे. आणि याचे वाढते दर सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचविणारे आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ElttM1
Post a Comment