Header Ads

ad

ऑमिक्रॉनचा धोका वाढतोय, राज्यात 'या' वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची तयारी

औरंगाबाद : करोना संसर्ग रोखण्यासाठी १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटांतील मुलांची संख्या किती आहे, याची आकडेवारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात या वयोगटातील सुमारे अडीच लाख मुलांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरण गरजेचे असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात आली. अशा नागरिकांची संख्या ३२ लाख आहे. करोना संसर्ग झपाट्याने वाढत असून तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्यामुळे मुलांचेही लसीकरण करण्यासाठी तज्ज्ञांनी केंद्र सरकारला सूचना केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन १५ ते १८ वर्षांमधील मुलांची संख्याही जमा करत आहे. त्यानुसार लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे. औरंगाबाद शहरात या वयोगटातील सुमारे अडीच लाखांपेक्षा अधिक मुलांची संख्या आहे. लसीकरण केंद्र वाढणार १५ वर्षांवरील मुलांना लस देण्यात येणार आहे. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाची तयारी सुरू आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढेल, असेही सांगण्यात येत आहे. आता जी केंद्रे आहेत, ती राहतील आणि त्याचबरोबर अकरावी, बारावीची महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, सरकारी व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची केंद्रे ठेवण्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थिसंख्या, लशीचा उपलब्ध साठा यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. १५ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण करण्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीकोनातून अशा मुलांची संख्या किती, याचा आढावा घेतला जात आहे. अद्याप ही संख्या निश्चित नाही. लवकरच आकडेवारी निश्चित केले जाईल, अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z1eG83

No comments