Header Ads

ad

लेखकांनो; शरण जाऊ नका, जावेद अख्तर यांचे साहित्यिकांना आवाहन

जो बात कहते डरते हैं सब, तू वो बात लिख,नाशिक : इतनी अंधेरी थी ना पहेले कभी रात लिख... या शब्दांत प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी साहित्यिकांनो, राजकीय पक्षांना शरण जाऊ नका. आपणी लेखणी समाजाच्या लढाईसाठी वापरा, असे शुक्रवारी ठणकावून सांगितले. 'पूर्वी ठामपणे बोलणाऱ्यांना धोकादायक म्हटले जायचे, आता त्यांना देशद्रोही ठरवले जाते. तरीही बोलत राहिले पाहिजे,' अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीचे पडसाद संमेलनात उमटले. मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादा भुसे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आदी उपस्थित होते. मराठी साहित्योत्सवात येण्याचा आनंद व्यक्त करतानाच अख्तर यांनी साहित्यिकांना साहित्याचे महत्त्व आणि भूमिका याबद्दल समजुतीचे चार शब्द सुनावले. इतर वक्त्यांनी मात्र आरोपांना उत्तर देण्यासाठी संमेलनाच्या व्यासपाठीचा वापर केला. मराठी संतांच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य माणूस होता, हा दाखला देऊन अख्तर यांनी साहित्यिकांनीही सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवण्याचा सल्ला दिला. सर्वसामान्यांना जागवणारा लेखकच सर्वांत मोठा असतो, अशी टिप्पणी त्यांनी केली. 'लोकशाहीमध्ये सरकार आणि राजकारणी जसे महत्त्वाचे; तसेच साहित्यिक आणि सामान्य नागरिक यांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याचे बळ जात, धर्म, प्रांत या भेदाभेदातून नव्हे; तर भारतीयत्वाच्या एकतेतूनच येते. साहित्यिक सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत नसतील तर तुमची लेखणी काय करते, हा सवाल त्यांना विचारायला हवा,' अशा शब्दांत अख्तर यांनी साहित्यिकांना फटकारले. सर्व समाज भीतीच्या वातावरणाखाली जगत असेल तर ते सुदृढ समाजाचे लक्षण नाही. अशा वेळी साहित्यिकांनी राजकीय पक्षांची तळी न उचलता सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढायला हवे, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. प्रेम, चंद्र, चांदण्या असे ठरावीक चौकटीतील ललित लेखनच अनेक वाचकांना भावते, मात्र रस्त्यावरील वेदनेचे साहित्य त्यांना भिडत नाही, या वास्तवाकडे बोट दाखवून अख्तर यांनी वाचकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नारळीकर यांच्या भाषणाची चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. राजकारणाबद्दल बोलावेच! लेखकांनी राजकारणाबद्दल बोलू नये असा सूर समाजात उमटताना दिसतो. मात्र, दैनंदिन जीवन राजकारणापासून वेगळे काढता येत नाही. आज गळ्यापर्यंत पाणी आलेले आहे. ते नाकातोंडात जाईपर्यंत गप्प बसू नये आणि राजकारणापासून स्वतःला दूर ठेवू नये. यासाठी लेखकांनी राजकारणासंदर्भात भूमिका घेतल्या पाहिजेत, याची आठवण त्यांनी करून दिली. लोकांना एकमेकांशी सहज बोलता यावे, म्हणून भाषा निर्माण झाली; पण भाषा हीच आजच्या संवादातील भिंत झाली आहे. भाषेच्या पलीकडील जग आपण विसरलो आहोत. भाषेमुळे कूपमंडूकत्व नको. -जावेद अख्तर


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lzfs6J

No comments