Header Ads

ad

राज्यात ओमिक्रॉनचा धोका, पुन्हा लॉकडाउन होणार?; आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

म. टा. विशेष प्रतिनिधी, राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी तूर्तास लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी शनिवारी केली. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, त्या दिवशी लॉकडाउन लागू होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. सध्या राज्यात झपाट्याने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत लॉकडाउनचा कोणताही विषय नव्हता, असा खुलासा केला. परंतु, मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात निर्बंध जरूर वाढवले पाहिजेत. मात्र, ज्या वेळी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होईल, अशा पद्धतीने ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता इतक्या लवकर लॉकडाउनचा विषय नाही.' 'लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. लोकांनी पहिल्या दुसऱ्या लॉकडाउनची झळ सोसली आहे. निर्बंधांबाबत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. खाटांची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील,' असेही टोपे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जे निर्बंध लागू केले आहेत, त्याची कठोर अंमलबजावणी करणे हा एक आव्हानात्मक विषय आहे. संक्रमण होऊ नये किंवा संसर्ग वाढू नये या दृष्टिकोनातून उपाय करण्यास राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात ९० टक्के खाटा रिकाम्या पुणे : पुणे शहरात गेल्या १५ दिवसांत सक्रिय करोना रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णसंख्येतील वाढ नगण्य आहे. करोना रुग्णांवरील उपचारासाठी महापालिका हद्दीत ६७०० खाटांची तयारी असून, शनिवारी केवळ ३२५ खाटांवर रुग्णांवर उपचार सुरू असून, ९० टक्के खाटा रिकाम्या आहेत. 'विकासात करोनाचा अडथळा नाही' नवी दिल्ली : 'नव्या वर्षात विकासाला आणखी वेग देण्याची गरज असून, करोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना विकासाच्या मार्गातला अडथळा होऊ देणार नाही,' असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. 'भारत पूर्ण सतर्क आणि सावध राहून करोनाचा सामना करील आणि आपल्या राष्ट्रीय हितांचेही रक्षण करील,' अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eFjBlZ

No comments