'आमचे संसार उघडयावर येत आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती की....'
हिंगोली : सध्या जिल्ह्यात गाव तिथं दारु अशी परिस्थिती असल्याने, व्यसनांध लोकांची आकडेवारी वाढत चालली आहे. वाढत्या तळीरामांमुळे गावात शांतता नांदत नाहीय. याच साऱ्या प्रकारामुळे असह्य झालेल्या हिंगोली तालुक्यातील बोराळा येथील संतप्त महिलांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे धाव घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना गावातली दारु बंद करण्याची हात जोडून विनंती केलीय. महिलांनी दारुबंदीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक यांना दिलंय. हिंगोली तालुक्यातील बोराळा येथील गजानन सखाराम बंदुके, दगडू जळबाजी बनसोडे आणि धोंडूबा पुंजाजी जटाळे हे तिघे जण मागील पाच वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री करीत असल्याचे महिलांनी पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे तिघे दारू विक्री करीत असल्याची कल्पना महिला मंडळाच्या वतीने हिंगोली येथील ग्रामीण पोलीस ठाण्याला दिलीय एवढंच काय तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला देखील कळवले. तरीही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट संबधित विभागाला कळवल्यानंतर अजून दारुविक्रीला गती येतेय. त्यामुळे तळीरामाची संख्या वाढत असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर गावात शांतता देखील नांदत नाहीय. तळीराम हे महिलांकडे देखील वाईट नजरेने बघत असल्याची कैफियत महिलांनी मांडली. रस्त्याने महिला जाताना, तळीराम त्यांना शिवीगाळ तसंच टोमणे मारत असल्याचे देखील महिलांनी सांगितले. महिलांची कळकळीची विनंती अनेक संसार उघड्यावर येत असल्याने, महिला वर्ग हैराण झालाय. तळीराम घरातील पैसे चोरुन नेत तसेच हाती पडेल ती वस्तू विकून दारु पित असल्याचा महिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे दारु विक्री बंद करण्याची कळकळीची विनंती महिलांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडे केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ILaxZw
Post a Comment