दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार?, संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सर्वपक्षीय पॅनेलची सरशी झाली आहेत. आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नावाची घोषणा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. मात्र, पॅनेलचे नेते व संचालक यांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. अध्यक्ष, उपाध्यक्षपद कोणाकडे व किती वर्षासाठी असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, अशी माहिती संघाच्या सूत्रांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली. सुमारे १२० कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक पदाची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरली. २०१५ मध्ये संघाची निवडणूक बिनविरोध झाली होती. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, मुदतअखेर १४ पैकी ७ संचालक बिनविरोध निवडून आले. तर उर्वरित ७ संचालकपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, भाजप नेते हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह पॅनेलचे नेते-कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या सर्वपक्षीय एकता सहकारी पॅनेलला अपेक्षित यश मिळाले. या पॅनेलला सातही जागामिळाल्या. आता, संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी आता कोण विराजमान होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दहा वर्षांपासून बागडे यांनी संघाचे अध्यक्षपद भूषविले आहे. यंदाही तेच अध्यक्ष असतील, असे महसूल राज्यमंत्री सत्तार यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार सोहळ्यास घोषित केले आहे. यासंदर्भात आमदार बागडे यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'दूध संघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. सत्तार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत लवकरच बैठक होईल व त्यात सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. अद्याप तरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.' संघाचे विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे म्हणाले, 'नियमाप्रमाणे येत्या १० ते १२ दिवसात संचालक मंडळाची बैठक होणार आहे. पदांबाबत नेतेमंडळी चर्चा करून पुढील निर्णय घेतील. दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्ष पद कोणाकडे आणि किती वर्षांसाठी याचा निश्चित फॉर्म्युला ठरलेला नाही. पॅनेल प्रमुख चर्चा करूनच पुढील निर्णय घेतील, असे एका संचालकाने सांगितले. त्यामुळे, अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fVSmUU
Post a Comment