चिंताजनक! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, २०२१ या वर्षात मराठवाड्यातील ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी २०२२ च्या २७ तारखेपर्यंत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात बीड जिल्ह्यात १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यात ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून, सर्वदूर सिंचनाची सोय नाही. पाणीटंचाई हा नेहमीचाच प्रश्न असलेल्या या विभागातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यात गेल्या दोन ते तीन वर्षांत ऐन खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. रब्बी हंगामातही अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्ज काढून पेरणी करणे, पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही यामुळे शेतकरी कमालीचे अडचणीत आले. या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, याचा सामना नेहमीच करावा लागतो. त्यामुळे या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या; तर २०२१ या वर्षात ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात आतापर्यंत ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या सर्वाधिक म्हणजे १४ आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाच, परभणी व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, नांदेड व जालना तीन, तर हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, अशी माहित विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Nd7p6xV8m
Post a Comment