लालपरी पुन्हा सुरु करण्यासाठी प्रशासनाचे नवे प्रयत्न, ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काढला 'हा' मार्ग
औरंगाबाद : एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे एसटीची प्रवासी वाहतूक सेवा थांबली होती. ही सेवा चालविण्यासाठी खासगी कर्मचाऱ्यांची नेमणूक एजन्सीच्या माध्यमातून करण्यात आली. औरंगाबाद विभागात ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असून कामाच्या बाबत तक्रारी एकही आली नसल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली. खासगी कर्मचारी वाढविण्याबाबतचा निर्णय आगामी दहा दिवसांनंतर घेण्यात येणार असल्याचे संकेत एसटी विभागाकडून देण्यात आले आहे. एसटीमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा संप आताही सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने वारंवार सेवेत पुन्हा येण्याची विनंती केली. या विनंतीनंतर अनेक कर्मचारी कामावर पुन्हा आलेले आहेत. कामावर पुन्हा आलेल्या कर्मचाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई प्रशासनाने मागे घेतली. एसटी प्रशासनाच्या आवाहनानंतर औरंगाबाद विभागात एक हजाराच्या वर कर्मचारी अजूनही संपावर आहेत. आगामी काही दिवसात संपावर असलेले कर्मचारी पुन्हा कामावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एसटी सेवा विस्कळीत झाल्यामुळे खासगी एजन्सीच्या माध्यमातुन एसटी चालविण्यासाठी खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद विभागात ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीत २५ कर्मचारी हे सीबीएस स्थानकात पाठविण्यात आले आहे. १५ खासगी कर्मचारी सिडको आणि १५ कर्मचारी सिल्लोड आगारात देण्यात आलेले आहेत. या खासगी कर्मचाऱ्यांची आतापर्यंत कोणतीही तक्रार आली नसल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. असे आहेत खासगी कर्मचारी एसटीच्या सेवेत लागलेले खासगी कर्मचारी हे स्कूल बस, ट्रॅव्हल्स आणि इतर मोठ्या गाड्या चालविणारे आहेत. सध्या या कर्मचाऱ्यांकडून कोणताही मोठा अपघात झाला नसल्याची माहिती समेार आली आहे. तसेच ड्युटीबाबत जुन्या कर्मचाऱ्यांच्या काही वारंवार तक्रारी होत होत्या. या कर्मचाऱ्यांच्या अशाही तक्रारी नसल्याची माहिती समोर आली आहे. तर वाढविणार खासगी कर्मचारी सध्या आंदोलनावर असलेले एसटी कर्मचारी हे आगामी काही दिवसात परत कामावर येण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन खासगी कर्मचारी वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही. मात्र हे कर्मचारी कामावर परत आले नाही. तर खासगी कर्मचारी वाढविण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठवावा लागणार असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात एकूण ५० खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे काम दिले जात आहेत. सध्या त्यांची कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. खासगी कर्मचारी वाढविण्याचा निर्णय आगामी काही दिवसांत परिस्थिती बघून घेण्यात येईल.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/APSq3HR5K
Post a Comment