Header Ads

ad

निर्बंध आणखी सैल होणार, मार्चमध्ये काय असेल करोनाची स्थिती? वाचा सविस्तर

मुंबई : कोणतेही निर्बंध वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. दर आठवड्याला निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी झालेले पाहायला मिळतील. काही ठिकाणी निर्बंध कमीही केले आहेत. यापुढेही टप्प्याटप्प्याने ते कमी केले जातील. तज्ज्ञांच्या माहितीनुसार तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार आहे, याकडे टोपे यांनी लक्ष वेधले. 'राज्यातील करोना रुग्णांची संख्या आता अटोक्यात येत आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांतही करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात करोनाची तिसरी लाट संपेल', अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. तर येत्या काळात निर्बंध आणखी शिथिल केले जातील, असे सूतोवाचही त्यांनी केले. जालना येथील एका कार्यक्रमात टोपे यांनी करोनास्थितीची माहिती दिली. 'गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील रुग्णसंख्या ४८ हजारांच्या घरात होती. आता ती १० ते १५ हजारांवर आली आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत होती, तिथेही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगडसारख्या जिल्ह्यांत करोना रुग्ण कमी झाले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे-सहाशेवर आली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. त्यामुळे मार्चपर्यंत तिसरी लाट ओसरेल. ज्याठिकाणी करोना रुग्णसंख्या वाढली नव्हती, त्याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अन् कमीही होईल', असे टोपे म्हणाले. देशातील मृत्युसंख्या ५ लाखांवर देशातील करोना मृत्युसंख्या गुरुवारी पाच लाखांवर पोहोचली. यामुळे पाच लाखांहून अधिक मृत्यू झालेला भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे. अमेरिका व ब्राझीलमध्ये पाच लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. २१७ दिवसांत अखेरचे एक लाख मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ८पर्यंत १०७२ नवे मृत्यू झाल्याने भारताची एकूण मृत्युसंख्या ५ लाख ५५ झाली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4p3jZHS

No comments