४० वर्षांची प्रतीक्षा संपणार; दक्षिण मुंबईतून अलिबाग दीड तासांत शक्य
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः दक्षिण मुंबईतून अलिबागला रस्ते मार्गाने दीड तासांत पोहोचणे लवकरच शक्य होणार आहे. करंजा ते रेवसदरम्यान धरमतर खाडीवर दोन किमीचा चारपदरी पूल उभारण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागवल्या आहेत. ऑक्टोबरपासून पूलउभारणीचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर रेवस ते रेड्डीदरम्यान ४४७ किमीचा सागरी महामार्ग उभारला जात आहे. या मार्गावर करंजा ते रेवसदरम्यान खाडीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. १९८०च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी या खाडीपुलाला मंजुरी दिली होती. मात्र तेव्हा काही कारणांमुळे तो होऊ शकला नाही. मात्र आता ४० वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. ऑक्टोबरपासून या पुलाच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असून, तो पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागणार आहेत. ऑक्टोबर २०२५मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी सुमारे तीन हजार ५७ कोटी रुपये खर्च येणार आहे. याला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून, आता 'एमएसआरडीसी'ने कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या दक्षिण मुंबईतून अलिबागला जाण्यासाठी साडेतीन तासांहून अधिक वेळ लागतो. या प्रकल्पामुळे मुंबई आणि अलिबागमधील अंतर कमी होणार आहे. सध्या 'एमएमआरडीए'कडून मुंबई पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) रस्त्याचे काम सुरू आहे. २०२३मध्ये ते पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे शिवडीवरून थेट नवी मुंबईतील चिर्ले येथे पोहोचता येणार आहेत. तर पुढे खाडीवरील नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे अलिबाग अधिक जवळ येणार आहे. कोकणात रस्ते मार्गाने पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या प्रवासवेळेत यामुळे मोठी बचत होणार असून, या भागातील पर्यटनाला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'स्टील स्ट्रक्चर' बांधकाम करंजा ते रेवस खाडीवर २.०४ किमीचा पूल बांधला जाणार आहे. तर करंजाच्या दिशेला ५.१ किमी आणि रेवसच्या दिशेला १.७ किमी लांबीचा जोडरस्ता उभारला जाणार आहे. या खाडीतून मच्छिमार बोटी आणि बार्ज यांची ये-जा सुरू असते. पुलामुळे जलवाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी स्टील स्ट्रक्चर पद्धतीचे बांधकाम करण्यात येणार असून, १२० मीटर लांबीचे १७ गाळे उभारले जाणार आहेत. समुद्राच्या उच्चतम लाटेच्या तुलनेत हे गाळे ३० मीटर उंच असणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5XR3Kcy
Post a Comment