एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होणार?; संपप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू आहेत. आज, मंगळवारी संपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी असून एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार का, याकडे जवळपास लाखभर एसटी कर्मचाऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली. करोनाकाळ नियंत्रणात आल्याने रेल्वेच्या प्रतीक्षायादीत मोठी वाढ होत असताना सर्वसामान्यांची एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. सध्या कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांसह एकूण ६० हजारांहून अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरी साडेसहा लाख प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांकडून महामंडळाला सरासरी रोज चार कोटींचे उत्पन्न मिळाले. कर्मचारी संपावर ठाम राहिल्याने खासगी चालकांच्या मदतीने एसटी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, असा दावा एसटी महामंडळातर्फे करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रीसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर झाला आहे. या अहवालात नेमके काय आहे हे आज, मंगळवारी स्पष्ट होईल. यामुळे तूर्त या प्रकरणी बोलणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vyTDB3i
Post a Comment