आरडीच्या पैशाचा वाद, युवकाची धारदार शस्त्राने हत्या, यवतमाळ हादरलं
रवी राऊत/यवतमाळ : आरडीच्या पैशाच्या वादातून यवतमाळमध्ये करण्यात आली आहे. ही घटना किन्ही येथे घडली असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकाश राठोड (३२) रा. किन्ही असे मृताचे नाव आहे. मृतक प्रकाश हा अभियोक्ता हेमंत पवार (२२) रा. किन्ही याच्याकडे आरडी जमा करीत होता. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मृताने आरडीचे पैसे दे, अशी मागणी केली. तेव्हा या पैशाच्या वादातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडणात मला आजच पैसे हवे, असे म्हणून त्या दोघांचा वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपीचा भाऊ अमोल पवार (२४) व नातेवाईक विरेंद्र राठोड यांनी मृतक प्रकाशला बेदम मारहाण केली. त्यावेळी हेमंतने धारधार सुरीने मृतकाच्या मानेवर व छत्तीवर वार करून त्याला गंभीर जखमी केले. नातेवाईक व ग्रामस्थ मृतकाला गंभीर जखमी अवस्थेत घाटंजी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी प्रकाशला मृत घोषित केले. याबाबत फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी गावातील लोकांचा आरोपींविरुद्ध रोष व्यक्त होत असल्याने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने घटनास्थळावरून आरोपींना पोलिसांनी अटक केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी जमावाची समजूत काढली व आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ११ फेब्रुवारी रोजी मृतकाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस निरीक्षक मनीष दिवटे, पोलीस उपनिरीक्षक विलास सिडाम, पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे, राहुल खंडागळे, प्रदीप मेसरे, विशाल वाढई करीत आहे. जमाव पोलीस ठाण्यावर धडकला... गावकऱ्यांनी रात्री पोलीस स्टेशनवर धाव घेत आरोपी दाखवा, अशी मागणी करीत रोष व्यक्त केला. जमावामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घाटंजी पोलीस निरीक्षक मनीष दिवटे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली. पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण, साहाय्यक पोलीस निरिक्षक हेमराज कोळी व पोलीस कर्मचारी घाटंजीत दाखल झाले. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेत घाटंजीला भेट दिली. आरोपींना पांढरकवडा येथे कोठडीत रवाना करण्यात आले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uL78RV
Post a Comment