'भाजपमध्ये जाण्याची वेळ का आली?'
मुंबई : 'काही नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेले? पब्लिक सब जानती है,' अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी नारायण राणे यांना टोला लगावला. राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भुजबळांवर जे आरोप झाले होते, तसेच आरोप मातोश्रींवर आहेत. भुजबळ अडीच वर्ष आत गेले, तसेच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्याची माहिती मी पोहोचती केल्याचे राणे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व छगन भुजबळ या दोघांचाही चार्टर्ड अकाउंटंट एकच आहे, असा दावा राणे यांनी केला. राणे यांच्या आरोपांना भुजबळ यांनी नाशिक येथे उत्तर दिले. उद्धव ठाकरे आणि माझे सीए वेगळे आहेत. त्यांच्या सीएचा आमच्या सीएशी संबंध नाही. आजकाल कारवाई करताना मटेरिअल महत्त्वाचे नाही. दिल्लीवरून आदेश आला की, काही नसले तरी कारवाई होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक आपल्या पक्षात येणार म्हटल्यावर, इनको छोड दो असा उलटा संदेश येतो, असा दावा भुजबळ यांनी केला. 'एक दोन माणसे राज्यभर आरोप करत फिरत होती. त्याला संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. काँग्रेस सोडून काही लोक भाजपमध्ये का गेले, हे सगळ्यांना माहिती आहे,' असा टोलाही भुजबळ यांनी राणे यांचे नाव न घेता हाणला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wpUFjdT
Post a Comment