मुंबईत मोठी कारवाई, खोल समुद्रात ८०० किलो अंमली पदार्थ जप्त
मुंबई : मुंबईच्या दिशेने आणला जाणारा अंमली पदार्थांचा मोठा साठा अरबी समुद्रात जप्त करण्यात आला आहे. नौदल व अंमल पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) ही संयुक्त कारवाई केली. खोल समुद्रात करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये ८०० किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबईसह संपूर्ण पश्चिम किनाऱ्यावर अंमली पदार्थांची तस्करी ही इराण, इराक व अफगाणिस्तानातून समुद्रमार्गे होत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक मोठी तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती 'एनसीबी'ला मिळाली. तस्करीचा साठा मुंबईत पोहोचण्याआधीच खोल समुद्रात जप्त करण्याची गरज होती. खोल समुद्रात (२४ सागरी मैलापलिकडे) कारवाईचा अधिकार नौदलाला असतो. तसेच नौदलच त्यात निपुण असते. यामुळे एनसीबीने ही माहिती नौदलाला दिली. नौदल व एनसीबीने संयुक्तपणे शनिवारी पहाटे ही कारवाई करीत ५२९ किलो चरस (हशीश), २३४ किलो मेटमफोटामाइन व काही प्रमाणात हेरॉइनचा साठा जप्त केला. या अंमली पदार्थांचे बाजारमूल्य २ हजार कोटी रुपये आहे. ही कारवाई पश्चिम समुद्री क्षेत्रात करण्यात आली. नौदलाच्या पश्चिम समुद्री क्षेत्राचे नियंत्रण मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडकडे आहे. त्यामुळेच या कारवाईसाठी युद्धनौकांचे समन्वयन मुंबईतून करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xB34kJU
Post a Comment