Header Ads

ad

Shivjayanti 2022 : शिवजन्मोत्सव दणक्यात होणार, 'असे' असतील कार्यक्रमाचे नियम

नाशिक : करोना निर्बंधामुळे दोन वर्षांपासून जल्लोषात साजरा न झालेला शिवजयंती उत्सव यंदा दणक्यात आणि थाटामाटात होणार आहे. शहर पोलिसांनी बहुतांश मंडळांना सशर्त परवानगी दिली असून, फक्त पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली आहे. यासह एका ठिकाणी पाचशे नागरिकांना शिवजयंती साजरी करता येईल. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजन्मोत्सवाचा दणदणाट सर्वाधिक राहणार असल्याची चिन्हे आहेत. त्यासाठी चोवीस पोलिस निरीक्षकांसह हजारपेक्षा अधिक कर्मचारी, होमगार्ड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र बॅनर, ध्वज लावण्यासह पारंपरिक वाद्यांच्या नादात एकाच ठिकाणी उत्सवाला परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनीही जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी प्राप्त होणाऱ्या अर्जांपेक्षा यंदा निश्चितच अधिक अर्ज परवानगीसाठी दाखल झाल्याचे विशेष शाखेने सांगितले. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत अंतर्गत एक खिडकी योजनेत जयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत मंडळांचे अर्ज दाखल झाल्याचे दिसले. त्यानुसार अटी-शर्तींची समज देत पोलिसांनी परवानगी दिली आहे. दोन वर्षांनंतर शिवजयंती साजरी होणार असल्याने सर्वांमध्ये उत्साह आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सवाचा सोहळा अधिक जल्लोषात होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्व पथकांसह अधिकारी-कर्मचारी आणि अधिकची कुमक मागवत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. फौजफाटा असा... - परिमंडळ १ : उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, १४ पोलिस निरीक्षक, ४६ उपनिरीक्षक, ४७५ पुरुष आणि १०५ महिला कर्मचाऱ्यांसह १०० होमगार्ड - परिमंडळ २ : उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, १० पोलिस निरीक्षक, ३३ उपनिरीक्षक, ३८५ पुरुष आणि ७५ महिला कर्मचारी, १८५ पुरुष आणि ६५ महिला होमगार्ड - एसआरपीएफ, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक-नाशक पथक, वाहतूक शाखेसह सर्व गुन्हे शाखेची पथके मार्गदर्शक सूचना - मोकळ्या जागेतील कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने ५०० नागरिकांना परवानगी - कोणत्याही परिसरात मिरवणूक काढता येणार नाही - प्रभातफेरी, बाइक रॅली काढू नये - सुरक्षित अंतराचे पालन करून कार्यक्रम घ्यावेत - १९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर शहरातील होर्डिंग्ज, फलक उतरवून घ्यावेत


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nEpWXrR

No comments