Header Ads

ad

कितीही डोके आपटा, ठाकरे सरकार पडणार नाही: संजय राऊत

मुंबई: 'महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बसणे कठीण आहे हे राज्यपालांनाही चांगलं माहीत आहे. त्यामुळं वैफल्यग्रस्त विरोधी पक्षानं राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके आपटले तरी उद्धव ठाकरे यांचं सरकार पडणार नाही ही रायगडावरील काळ्या दगडावरची रेघ आहे,' अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात राजकारण रंगलं आहे. विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांना २७ मेच्या आधी कुठल्याही एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्यपाल कोट्यातील दोन रिक्त जागांपैकी एका जागेसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, शिफारशीला १५ दिवस उलटूनही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. राज्यपालांनी हा निर्णय घेऊ नये व राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी राज्यातला विरोधी पक्ष प्रयत्नशील असल्याचा आरोप राऊत यांनी 'सामना'त लिहिलेल्या एका लेखातून केला आहे. 'महाराष्ट्रातील विरोक्षी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. राज्य संकटात असताना येथे अराजकाची आग लागावी अशी त्यांची इच्छा आहे. याकामी ते राज्यपाल या संस्थेस बदनाम करीत आहे. राज्यपालांनीच हे थांबवावे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 'राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं तीन पक्षांचं सरकार आहे. या सरकारनं राजकारणाचं ‘लॉक डाऊन’ करून कामाला प्राधान्य दिलं आहे. मात्र या लढाईत विरोधी पक्ष नावाचा घटक नक्की कोठे आहे, हे शोधले तर त्याचे अवशेष राजभवन परिसरात दिसतात. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय ठरत आहेत याचा आनंद राज्यातील विरोधी पक्षाला कसा होईल? दु:खाचे ते कढ राहणारच,' असा टोलाही राऊत यांनी हाणला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bFZwbX

No comments