Header Ads

ad

'मुंबईवर भगवा फडकवण्याच्या नादात भाजप करोना वाढवतोय'

मुंबई: 'करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, महाराष्ट्र व पं. बंगालच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. गर्दी, दाटीवाटी करत आहेत. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात भाजपवाले करोना वाढवत आहेत,' असा घणाघाती आरोप शिवसेनेनं केला आहे. अद्याप दीड वर्षे लांब असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याचं आवाहन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळं दुखावली गेली आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेनेनं ''च्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपनं पुकारलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं शिवसेनेनं हा निशाणा साधला आहे. 'दुसऱ्या विश्वयुद्धानंतर करोना हेच सगळ्यात मोठे संकट आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, असं मोदींनी म्हटलं आहे. मात्र, आपल्या देशात दिव्याखाली अंधार आहे. करोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असं मोदींच्या भक्तांनी ठरवून टाकलं आहे. भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा केला. तोंडास मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, वाहतुकीसंदर्भात नियमांचं पालन नाही. करोनाला मुके देत व मुके घेत या मंडळींनी जो शिमगा केला, तो विरोधी पक्षाचा सरकारविरोधी कार्यक्रम अमानुषतेचं लक्षण आहे. आपल्या या राजकीय गोंधळातून मुंबई-महाराष्ट्रात करोनाचं संकट वाढत आहे याचं भान त्यांनी ठेवावे,' असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. वाचा: 'करोना रुग्णांचा आकडा वाढतोय. सरकार करोनाशी लढण्यात अपुरं पडतंय असं एका बाजूला बोंबलायचं आणि त्याच वेळी नियमबाहय़ राजकीय गोंधळ घालून करोनाचा प्रसार वाढवायचा. करोनाची दुसरी ‘लाट’ आपल्या राजकीय विचारांची आहे असं भाजपला वाटतंय. उठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे?,' असा सवाल अग्रलेखातून करण्यात आलाय. वाचा: 'भाजपला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे. ते त्यांचं अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची करोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापड विजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे. राजकारण्यांच्या काळजात मायेचा ओलावा नसेल तर ते हे असे बेजबाबदारपणे वागतात व त्यात निरपराध्यांचे बळी गेले तर त्याचा विजयोत्सव साजरा करतात. दुसऱ्याच्या पराभवात एक वेळ आनंद मानता येईल, पण कोरोना महामारी संकट वाढविण्यास हातभार लावायचा. ते वाढले की त्यावर सरकारला कोंडीत पकडायचे, असा विचार करणे म्हणजे आपल्याच प्रजेला डोळ्यादेखत महामारीच्या कत्तलखान्यात पाठविण्यासारखे आहे,' असा संताप शिवसेनेनं व्यक्त केलाय. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. करोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी समजून घ्यावे, असा इशाराही देण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pQ1EFz

No comments