औरंगाबाद: एसटी डेपोत 'दंगल'; सुरक्षा रक्षकावर कर्मचाऱ्यांचा हल्ला
औरंगाबाद: 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन गावोगावी भ्रमंती करणाऱ्या परिवहनच्या सोयगाव आगारातच एसटी कर्मचाऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून पाच एसटी कर्मचाऱ्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव आगारातील कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना जळगावला रवाना करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव आगाराच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण हे कर्तव्यावर असताना तीन वाहक प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे व चालक राजू बारी, राजेंद्र भोपे हे पाच जण सकाळी ७ वाजता आगाराकडे येत होते. स्थानक प्रमुख कैलास बागुल यांनी सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण यांना सूचना देऊन या पाच जणांना आगारात प्रवेश देऊ नको, अशा सूचना देताच सुरक्षा रक्षक राणीदास यांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखले. त्यावर या पाचही जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. चालक रघुनाथ बारी याच्यासह पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे आगार परिसरात तणाव निर्माण झाला होता. राणीदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते, जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील, रवींद्र तायडे, सागर गायकवाड आदी करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kNSaa8
Post a Comment