खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
औरंगाबाद : काही दिवसांपासून थंडी तसेच ढगाळ वातावरणामुळे शहरभर सर्दी, खोकला, तापेसह श्वसनविकारांचे रुग्ण वाढले आहेत. मात्र याच रुग्णांची करोना चाचणी केल्यानंतर फार कमी किंवा नगण्य प्रमाणात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे शहरातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुरेपूर काळजी घ्या, पण काळजी करू नका आणि थंडीपासून बचाव करा, कोमट पाणी प्या, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ओमिक्रॉनच्या सावटाखाली नवीन वर्ष उजाडत असतानाच, काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण व बोचऱ्या थंडीने पारा घसरला आहे. परिणामी, काही दिवसांपासून विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत आणि बहुतांश क्लिनिक व रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात हेच रुग्ण सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहेत. बच्चे कंपनीही बेजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर म्हणाले, 'सध्या सर्वच वयाच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप दिसून येत आहे. दमा, श्वसनविकार व अॅलर्जीचे रुग्णही लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे जाणवत आहे. विशेषत: हिवाळा हा 'हेल्दी सीझन' म्हटला जातो; पण सतत बदलणाऱ्या वातावरणाचा फटका बालकांना बसत आहे.' प्रौढांमध्येही याच प्रकारचे रुग्ण दिसून येत असल्याचे सांगताना फिजिशियन डॉ. आनंददीप अग्रवाल म्हणाले, सर्दी, खोकला, तापेसह दमा, ब्राँकायटिस, सीओपीडीच्या रुग्णांचा आजार बळावल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. मात्र लक्षणांवरुन केलेल्या चाचणीत आतापर्यंत तरी फार कमी करोना रुग्ण आमच्याकडे आढळून आले आहेत, असेही डॉ. अग्रवाल म्हणाले. पॉझिटिव्ह रुग्ण एखाद-दुसरा सध्या तरी बहुतांश रुग्ण हे 'व्हायरल'चे असल्याचे जाणवत आहे. तापेसह इतर लक्षणे असलेल्या प्रत्येकाची आम्ही करोना चाचणी करुन घेत आहोत. त्यामध्ये एक किंवा फार तर फार दोन टक्के रुग्ण हे करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत, असे निरीक्षण फिजिशियन डॉ. अनंत कडेठाणकर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना नोंदवले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zcYBMK
Post a Comment