Header Ads

ad

करोनाच्या सावटात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त

औरंगाबाद : उत्साह, उमेद आणि अपेक्षा बाळगत औरंगाबादकरांनी मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. २०२१ या सरत्या वर्षाला निरोप देत २०२२ चे स्वागत करण्यात आले. शहरात करोना संसर्गामुळे कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करणाऱ्या हौशी नागरिकांना उत्साहाला आवर घालावा लागला. जमावबंदीचे पालन करण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी विविध चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात सलग दुसऱ्या वर्षी नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी करोना संसर्गाचे सावट अनुभवले. राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. रेस्टॉरंट, मोठी हॉटेल्स निम्म्या क्षमतेत सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आणि सांगीतिक सोहळ्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे अत्यंत कमी नागरिकांच्या उपस्थितीत मोजकेच कार्यक्रम पार पडले. उत्साही तरुणांनी शुक्रवारी सायंकाळी निराला बाजार, कॅनॉट प्लेस, सूतगिरणी चौक आणि बीड बायपास परिसरातील कॉफी शॉप, रेस्टॉरंटमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले. यानिमित्त बाजारपेठेत काही वेळ तरुणाईची लगबग आणि उत्साह दिसला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. जवळपास बारा तास एक हजार पोलिस नवीन वर्षानिमित्त बंदोबस्तासाठी तैनात होते. शहरातील ४० चौकात नाकेबंदी करण्यात आली होती. अवैध दारू विक्री व इतर बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्काने खास पथके नेमली होती. दरम्यान, करोनाचे सावट असल्यामुळे नागरिकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरगुती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टची रेलचेल वाढली होती. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेत नागरिकांनी सोसायटी आणि घरात नववर्षाचे स्वागत केले. तर यावेळी शहर व परिसरात नववर्षानिमित्त पोलीस बंदोबस्त होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qIorVf

No comments