होम क्वारंटाईनबद्दल धक्कादायक माहिती उघड, राज्यात तब्बल १०७५ रुग्णांचा जीव धोक्यात
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात करोनाबाधितांची संख्या रोज वाढतच आहे. बाधितांपैकी जास्तीतजास्त जणांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश सरकारी यंत्रणांनी दिल्यामुळे तीन हजार ३४० रुग्ण गृह आयसोलेशनमध्ये आहेत, त्यापैकी १०७५ जणांनी करोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर शहरात करोना संसर्गाची लाट फैलावत आहे. महापालिेकच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस दिवसात सुमारे सहा हजार नागरिक करोनाबाधित झाले आहेत. गृह विलगीकरणात जास्तीत जास्त बाधितांना ठेवण्याची परवानगी देण्यात आली असल्यामुळे तीन दिवसापूर्वीच्या आकडेवारीनुसार ३ हजार ३४० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने वॉर रुम मधून यंत्रणा सक्रीय केली आहे. वॉर रुम मधून गृह विलगीकरणातील प्रत्येक बाधिताला दिवसातून तीन वेळा फोन करुन त्याच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. वॉर रुम मधून थेट डॉक्टरच करोनाबाधितांशी संपर्क साधत आहेत. बाधितांशी चर्चा करुन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करीत आहे. या डॉक्टरांच्या संपर्कातूनच लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या पुढे आली आहे. ३ हजार ३४० गृह विलगीकरणातील रुग्णांपैकी दोन हजार ४४ रुग्णांनी लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत असे डॉक्टरांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. लसीचा एक डोस घेतलेल्यांची संख्या २२१ आहे. १०७५ रुग्णांनी मात्र लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे यातून स्पष्ट झाले. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांच्या कुटुंबातील सर्वांनाच करोना संसर्ग झाल्याचे देखील लक्षात आले आहे. पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी या बद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, लस घेतल्यावर करोना संसर्ग झाला तरी त्याची तीव्रता कमी असले, आरोग्यावर फार काही परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qNomkg
Post a Comment