नाशिक- सुरत अंतर कापणार अवघ्या सव्वा तासात; जिल्ह्यातून जाणार चेन्नई- सुरत ग्रीन फिल्ड महामार्ग
म. टा. प्रतिनिधी, नाशिकः केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चेन्नई-सुरत या सहापदरी महामार्गाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले आहे. हा महामार्ग जिल्ह्यातूनही १२२ किलोमीटर अंतरातून जाणार असून, या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर पावणेदोनशे किलोमीटरवर येऊन नाशिकहून अवघ्या सव्वा तासात सुरतला पोहोचता येणार आहे. सुरत ते चेन्नई या प्रकल्पांतर्गत या ग्रीन फिल्ड महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी ९८० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सुरत ते चेन्नई प्रवासासाठी तीन महामार्गांचा उपयोग केला जातो. त्यातील सुरत ते चेन्नई हे एक हजार ६०० किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे एक हजार २५० किलोमीटरवर येणार आहे. परिणामी नाशिकहून चेन्नईपर्यंतही आठ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गावर सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या एकूण प्रकल्पाची किंमत ५४ हजार कोटी आहे. या महामार्गामुळे लॉजिस्टिक पार्क, रिसर्च सेंटर, इंडस्ट्रियल क्लस्टर, अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रिज, कूलिंग प्लांटना चालना मिळणार आहे. सुरगाणा-पेठ या भागांमधून हा महामार्ग जात असल्याने आदिवासीपट्टाही विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. दिंडोरी-सिन्नरमधून सर्वाधिक मार्ग जिल्ह्यातील ६९ गावांमधून जाणाऱ्या हा महामार्ग सिन्नर आणि दिंडोरी तालुक्यातील बहुतांश अंतर व्यापणार आहे. दिंडोरी तालुक्यातून ४२.६४ किलोमीटरच्या अंतरात २३ गावांमधून, तर सिन्नर तालुक्यात ३१.६१ किलोमीटरच्या अंतरात १६ गावांमधून हे मार्गक्रमण होणार आहे. याशिवाय सुरगाणा तालुक्यातून १७.०२ किलोमीटर अंतरातून १२ गावे, पेठमध्ये ५.९२ किलोमीटर अंतरात ५ गावे, नाशिकमध्ये ११.९५ किलोमीटरमध्ये ४ गावे, निफाडमधून १२.९० किलोमीटरमध्ये ९ गावे यात समाविष्ट राहतील. भाजीपाला थेट बंदरावर या महत्त्वाकांक्षी महामार्गामुळे जिल्ह्यालाही मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातून उत्पादित होणारा कृषिमाल निर्यात करण्यासासाठीच्या लॉजिस्टिक कॉस्टमध्ये घट होणार आहे. हा भाजीपाला थेट बंदरावर पाठविता येणार आहे. आदिवासी भागातून जाणाऱ्या या महामार्गामुळे त्या परिसराचा विकास होण्यासही मदत होईल. पिंप्री सदो ते गोंदे हा २० किलोमीटर मार्गही सहापदरी होईल. गोंदे 'एमआयडीसी'चादेखील यामुळे विकास होणार आहे. सध्याचा अन् प्रस्तावित महामार्ग सद्यस्थितीत सुरत-मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-बेळगाव-चित्रदुर्ग-तुरकर्म-बंगलोर-चेन्नई याप्रमाणे महामार्ग आहे. ग्रीनफिल्डअंतर्गत हा मार्ग सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-करनूल-कडप्पा-चेन्नई याप्रमाणे तयार केला जाणार आहे. त्यामुळे दोन मुख्य शहरांतील अंतर घटणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pjtp2GX
Post a Comment