मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा; आठवडाभरात निर्बंधमुक्ती?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची दररोजची संख्या ४००च्या आत नोंद होते आहे. तसेच रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्या खाली आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. तसेच करोनास्थितीत मोठी सुधारणा झाल्यास सर्वच निर्बंध शिथिल करून मुंबई निर्बंधमुक्त होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून गेल्या काही महिन्यांपासून ओमायक्रॉनने निर्माण केलेली चिंता आता दूर होत असल्याची समाधानकारक स्थिती आहे. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी १,२७३ दिवसांपर्यंत पोहोचला आहे. राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने त्यानुसार निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबईत सध्या रुग्णांची संख्या ४००च्या आत स्थिरावली आहे. रोज ३५ ते ४० हजारच्या दरम्यान चाचण्या करण्यात येत आहेत. यात करोनाचा आलेख झपाट्याने उतरत असल्याचे स्पष्ट होते आहे. यापूर्वी हॉटेल, थिएटर व अन्य ठिकाणी लागू केलेले निर्बंध हटवून १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र मुंबईत रुग्णवाढीचा दर ०.८८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णवाढीचा दर वाढला असता तर संसर्ग वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट झाले असते. मात्र, आता तशी परिस्थिती नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या आठवड्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर निर्बंधांत अधिक शिथिलता आणण्याचा विचार केला जाऊ शकतो. आठवडाभरात परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत राज्याच्या कृती दलाला माहिती सादर केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8jgoQGC
Post a Comment