शिवसेना २०२४मध्ये दिल्लीच्या तख्तावर; आदित्य ठाकरे यांचा पुनरुच्चार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः 'मी दिल्लीत जे बोललो ते उत्तर प्रदेशातही बोललो. इथेही तेच सांगत आहे. महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलवण्याचा डाव आखला जात आहे. पण २०२४मध्ये शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसेल आणि सगळे थांबवेल', असा पुनरुच्चार पर्यावरणमंत्री यांनी रविवारी केला. तर 'येत्या काळात शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल. कोणतेही राज्य केंद्रीय तपास यंत्रेणेला घाबरणार नाही किंवा झुकणार नाही', असेही ते म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात आदित्य बोलत होते. प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढेल व भूमिपुत्रांना न्याय देईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. 'आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करूया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही आणि आजही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही', असे मत आदित्य यांनी व्यक्त केले. तर, 'सुभाष देसाईंनी शासकीय स्तरावर मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाईसरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करून द्यावी', असे ते म्हणाले. 'दहावीपर्यंत मराठीत शिकवावेच लागेल' 'मराठीच्या शाळा कमी होतात की जास्त यावरून वाद सुरू असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या शाळेत नव्या एसएससी बोर्डासह ११ शाळा 'सीबीएससी' आणि 'आयसीएससी'करिता सुरू आहेत. पालिकेच्या एक हजार २३२ शाळा आहेत. मात्र, कोणतेही बोर्ड असले तरी १०वीपर्यंत मराठी शिकवावेच लागेल', असे आदित्य यांनी यावेळी नमूद केले. 'स्वप्न काही सुटेना!' पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणारच, याचा पुनरुच्चार केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करीत त्यांच्यावर टीका केली. 'काही करता साधा नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सुटेना!', अशा आशयाचे ट्वीट करत त्यांनी आदित्य यांना लक्ष्य केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dVOv5KQ
Post a Comment