'अपना घर'चे स्वप्न भंगले; स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली दोनशे जणांची फसवणूक
- योजनेच्या संचालकासह बँक व्यवस्थापक अटकेत - बँकेकडून पाच वर्षांत गृहकर्जवसुली; घर मात्र नाहीच - फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन मुंबई : '' या नावाने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाहिराती देऊन लोकांना आकर्षित करून स्वस्त घराचे प्रलोभन दाखवून फसविणाऱ्या दोघांना 'आरसीएफ' पोलिसांनी अटक केली आहे. 'अपना घर' योजनेचा संचालक रवी राजन पांडियन आणि द ब्ल्यू पीपल बँकेचा व्यवस्थापक सुरेश राठोड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. घराचे बुकिंग करणाऱ्यांना दिलेले कर्ज द ब्ल्यू पीपल बँकेने पाच वर्षांत फेडून घेतले आणि घरे मात्र दिलीच नाहीत. अशाप्रकारे दोनशेहून अधिक लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न यांनी धुळीस मिळवले. वेगवेगळी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक निवास हक्क संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना स्वस्तामध्ये घरे दिली जात आहेत, अशी जाहिरात झळकली. नवी मुंबईतील एका निवृत्त वकिलाने ही जाहिरात पाहून संस्थेचे चेंबूर येथील कार्यालय गाठले. साडेतीनशे चौरस फुटाचे घर पनवेल येथे अवघ्या आठ लाख ५७ हजार रुपयांत देणार असल्याचे या कार्यालयात उपस्थित एका महिलेने सांगितले. या महिलेने वकिलांची 'अपना घर' योजनेचे संचालक रवी पांडियन यांच्याशी ओळख करून दिली. पनवेल कोलवाडी येथील एका रिकाम्या भूखंडावर निवासी संकुल बांधण्यात येत असल्याचे या वेळी पांडियन यांनी त्यांना सांगितले. घराची रक्कम पाच वर्षे सुलभ हप्त्यांमध्ये बँकेत भरायची आणि पाच वर्षांनंतर घराचा ताबा दिला जाईल, अशी योजना असल्याचे त्यांनी सांगितले. स्वस्तात घर मिळत असल्याने निवृत्त वकिलाने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. सन २०१३पासून २०१८पर्यंत पाच वर्षांत गृहकर्जाचे ६० हप्ते भरल्यानंतर वकिलाने घराच्या ताब्याबाबत विचारणा केली. तेव्हा स्टॅम्पड्युटी आणि नोंदणी, तसेच इतर फीच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी तीन लाख रुपये घेण्यात आले. यानंतरही घराचा ताबा देण्यासाठी चालढकल केली जाऊ लागली. संस्थेच्या चेंबूर येथील कार्यालयात वारंवार जात असल्याने या वकिलाची गुंतवणूक केलेल्या अन्य लोकांशी ओळख झाली. आपल्याबरोबरच इतर लोकांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमारे ३० ते ३५ जणांनी पोलिसांत धाव घेतली. वकिलाच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करून पांडियन आणि राठोड या दोघांना अटक केली. पांडियनविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत फसवणूक, बनावट कागदपत्रे बनविणे, मारामारी, दंगलीचे २० गुन्हे दाखल आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oGDSCxW
Post a Comment