आणखी दोन एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; संपावर तोडगा निघत नसल्याने आर्थिक विवंचना
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळे बँक खात्यात पगार नाही. त्यामुळे कुटुंबाचा खर्च पेलवत नसल्याने उस्मानाबाद विभागातील एसटीवाहक हनुमंत आकोसकर यांनी विष पिऊन जीवन संपवले, तर संपामुळे कुटुंबीयांचे भविष्य अंधारात दिसत असल्याने साताऱ्यातील एसटीचालक बाळकृष्ण पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. उच्च न्यायालयात शुक्रवारच्या सुनावणीत अहवालावर निर्णय होऊन संपावर तोडगा निघेल, अशी आशा आकोसकर यांना होती. मात्र यावेळी ११ मार्च ही पुढील तारीख देण्यात आली. यामुळे निराशा झाल्याने आकोसकर यांनी रात्री ८.३०च्या सुमारास विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर सहा आणि आठ वर्षांची दोन मुले आणि पत्नी यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. दुसरीकडे कराड आगाराचे चालक बाळकृष्ण पाटील संपात सहभागी होते. महामंडळाच्या अधिकारी वर्गाकडून कामावर हजर होण्याचा दबाव त्यांच्यावर होता. या तनावातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे. एकीकडून मुंबई उच्च न्यायालयातून तारखांवर तारीख मिळवून संप चिघळवायचा आणि दुसऱ्या बाजूने कंत्राटी तत्त्वावर वाहतूक चालवून आपला वाटा घ्यायचा असेच सरकारचे धोरण असल्याचे सातत्याने दिसून येत असल्याचा संपकरी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. राज्यातील मराठी एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत असताना सरकार निर्णय घेण्यास का विलंब लावत आहे, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राज्यातील प्रवाशांच्या सुविधेसाठी खासगी चालकांना नियुक्ती पत्र देऊन वाहतूक करण्यात येत आहे. ही नियुक्ती कंत्राटी आहे. आत्महत्या झालेले कर्मचारी संपात सहभागी झाले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक बोलणे योग्य नाही, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी हजारोंची भरती! एसटी महामंडळात वादग्रस्त ठरलेल्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या खासगी कंपनीलाच चालक पुरवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव नाही. लवकरच हजारो वाहकांची भरती करण्याची तयारी सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dPe4x8l
Post a Comment