सीमाभागाहून लांब राहा; युक्रेनमधील भारतीयांना दूतावासाच्या महत्त्वाच्या सूचना
वृत्तसंस्था, नवी दिल्लीः रशियन फौजा युक्रेनची राजधानी किव्हच्या अंतर्गत भागातही कूच करीत असतानाच तेथील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. युक्रेन सोडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांसोबत समन्वय न राखता सीमाभागांत जाऊ नये, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे. युक्रेनमधील परिस्थिती गेल्या दोन दिवसांत चिघळली असून, अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले, गोळीबार व क्षेपणास्त्रांचा मारा होत आहे. युक्रेनच्या पूर्व भागात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने विशेष सूचना दिल्या आहेत. या भारतीयांनी सध्या राहात असलेले स्थळ सोडू नये, घरातच राहावे किंवा सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे दूतावासाने म्हटले आहे. युक्रेनमध्ये २० हजार भारतीय असून, त्यापैकी चार हजार भारतात सुखरूप परतले आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्ष शांग्रिला यांनी गुरुवारी दिली होती. 'पूर्व युक्रेनमधील आपल्या निवासस्थानी राहात असलेल्या भारतीयांनी आगामी सूचना मिळेपर्यंत बाहेर पडू नये. अन्न, पाणी व इतर ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा वापर करीत निवाऱ्याच्या ठिकाणीच राहावे व धीर धरावा. आवश्यकता नसल्यास बंदिस्त ठिकाणाहून बाहेर पडू नये. किव्ह येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे. सीमा भागांतील तपासणी नाक्यांवरील परिस्थिती संवेदनशील आहे. युक्रेनमधील भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी किव्हमधील भारतीय दूतावास सातत्याने शेजारील देशांच्या भारतीय दूतावासांशी संपर्कात आहे. अशा वेळी आपणहून युक्रेनबाहेर पडण्य़ासाठी सीमाभागांत जाणाऱ्या भारतीयांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. युक्रेनच्या पश्चिम भागांत पाणी, अन्न, निवाऱ्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. हा भाग तुलनेने अधिक सुरक्षित आहे,' असेही या सूचनांमध्ये म्हटले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/J7TEixF
Post a Comment