Header Ads

ad

'या' तारखेपर्यंत मुंबई संपूर्ण निर्बंधमुक्त होणार, महापौरांची माहिती

मुंबई : फेब्रुवारी अखेरपर्यंत म्हणजेच २८ तारखेपरर्यंत मुंबईतील नागरिकांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर कृती दलाला अहवाल देऊन मुंबई संपूर्ण निर्बंधमुक्त केली जाऊ शकते, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारीअखेरीस करोनास्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनीही पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. मुंबईत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाची तिसरी लाट सुरू झाली. सुरुवातीला दररोज २०० ते २५० पर्यंत नोंदवली जाणारी रुग्णसंख्या थेट २१ हजारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारने निर्बंध कठोर केले होते. तिसरी लाट महिनाभरातच आटोक्यात आल्याने पालिकेने रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी उठवली आहे. तसेच चौपाट्या, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली असून चित्रपटगृह, नाट्यगृह, हॉटेल-रेस्टॉरंट, तरणतलाव ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आला आहे. सध्या दररोज सुमारे ५००हून कमी रुग्ण आढळून येत असून संपूर्ण मुंबईत केवळ एकच इमारत सील आहे. त्यामुळे मुंबई पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पावले उचलली जात आहेत. आठवडाभरात मुंबईत शंभर टक्के लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. पहिली मात्रा शंभर टक्के पूर्ण झाली असून दुसरी मात्रा ९६ टक्के पूर्ण झाली आहे, असे महापौरांनी सांगितले. १५ ते १८ वयोगटात तीन लाख मात्रा पूर्ण १८ वर्षांपुढील वयोगटातील सर्व सुमारे ९२ लाख नागरिकांचे लसीकरण आठवडाभरात पूर्ण होईल. तर, १५ ते १८ वर्षे वयोगटातील नऊ लाख पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे तीन लाख जणांची पहिली मात्रा पूर्ण झाली असल्याची माहिती देत लसीकरणाची आकडेवारी पाहता मुंबई संपूर्ण निर्बंधमुक्त करणे शक्य आहे, असे महापौर म्हणाल्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sRbyX1T

No comments