Header Ads

ad

एसटी संपामुळं जेरीस आलेल्या प्रवाशांना नवा त्रास; १०० एसटी स्थानकांचे...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही राज्यातील १०० एसटी स्थानकांचे काम रखडले आहे. तीन महिन्यांपासून एसटी संप सुरूच असल्याने प्रवास बेभरवसा झाला असतानाच प्रवाशांच्या थांब्याचे ठिकाण असलेल्या एसटी स्थानकांच्या देखभालीचा प्रश्नही तीव्र झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस स्थानके अत्याधुनिक करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. संबंधित वर्षांचा निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार कंत्राटदार नियुक्त करून कामे सुरू झाली. मात्र करोनामुळे ती रखडली. करोना पहिली लाट वगळता उर्वरित दोन्ही लाटांमध्ये विकास बांधकाम सुरू ठेवण्याची स्पष्ट सूचना सरकारने दिली होती. तरीही ही कामे रखडली आहेत. १०० स्थानकांसाठी जवळपास १५० कोटी रु.चा निधी टप्प्याटप्प्प्याने देण्यात आला होता. यापैकी अनेक स्थानकांचे काम निम्मे तर, काहींचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत निधीशिवाय काम पूर्ण करण्यात येणार नाही व वेळ पडल्यास न्यायालयाची पायरीही चढण्याची तयारी कंत्राटदारांची आहे, असे एसटीतील सूत्रांचे म्हणणे आहे. रखडलेल्या बांधकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत एसटी स्थानकांतील अपूर्ण बांधकामांना गती देण्याची व प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत, ही बांधकामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश परब यांनी अधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती महामंडळाने दिली. .........बांधकामांचा निधी शिवशाहीला? राज्य सरकारने दिलेला स्थानक बांधकामांसाठीचा निधी शिवशाहीतील कंत्राटदारांना देण्यात आल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आहे. करोनानंतर एसटी सुरू होताच हा निधी बांधकामे करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात येणार होता. मात्र तीन महिन्यांच्या संपामुळे अडचण निर्माण झाली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ceValZi

No comments