Central Railway Mega Block: रेल्वे कामगारांच्या हातांना 'मेगा वेग'; एक जलद मार्ग आज होणार खुला
- एक जलद मार्ग आज होणार खुला - १०० रेल्वे अधिकारी 'ऑन द स्पॉट' म. टा. प्रतिनिधी, मुंबईः तब्बल एक हजार कामगार, १६ अवजड मशीनच्या मदतीने १०० रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि देखरेखीखाली ठाणे-दिवादरम्यान दोन नवीन मार्गिका सुरू करण्यासाठी अखेरचे काम सुरू आहे. आज, रविवारी दोन धीम्या मार्गांसह एक जलद मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे ठाणे, कळवा आणि डोंबिवली स्थानकांवर दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. एक्स्प्रेससह ३५० लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वे यांनी संयुक्तपणे घोषित केलेल्या पूर्वनियोजित ७२ तासांच्या ब्लॉकचे काम शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. हा ब्लॉक पूर्ण झाल्यावर धीम्या, जलद आणि मेल-एक्स्प्रेस यांसाठी प्रत्येकी स्वतंत्र दोन मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. शुक्रवार-शनिवार मध्यरात्रीपासून ब्लॉकची तयारी करण्यात आली होती. यासाठी मुंबई, ठाण्यासह कल्याण परिसरातील कामगारांची जमावजमव करण्यात आली होती. ५०० मजूर दिवसा आणि ५०० मजूर रात्री या पद्धतीने ब्लॉकचे काम करण्यात येत आहेत. सहा टॉवर व्हॅन आणि अवजड मशीनची वाहतूक करण्यासाठी दोन रेल्वेगाड्यांसह एकूण १६ मशीनचा वापर ब्लॉकमध्ये करण्यात येत आहे. या कामगारांच्या जेवणासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ठाणे-दिवादरम्यान मोकळ्या जागेत दोन मंडप उभारण्यात आले आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्लॉकचे काम नियोजनाप्रमाणे सुरू राहण्यासाठी एमआरव्हीसीसह मध्य रेल्वेचे काही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या दिवसाचे काम सुरू झाल्यानंतर आणखी एक मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. मुंबई शहर परिवहन प्रकल्प २ मध्ये ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचा समावेश होता. गेल्या १२ वर्षांपासून लाल फितीच्या धीम्या कारभारामुळे हा प्रकल्प रखडला होता. ७२ तासांच्या ब्लॉकमध्ये पहिल्या २८ तासांनतर एक जलद मार्ग खुला होईल. त्यानंतर काही वेळेनंतर दुसरा जलद मार्ग उपलद्ध होईल. रविवारी आणि सोमवारी कमीत कमी लोकल फेऱ्या रद्द राहतील, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ब्लॉक संपल्यावर आगामी सात दिवस वेगमर्यादेसह लोकल गाड्या धावणार आहेत. - शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे ......
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/m7JuNqR
Post a Comment