Header Ads

ad

खाद्यतेल स्वस्त होण्याची चिन्हे; सूर्यफूल तेलाचे जहाज रशियाहून भारतात येणार

मटा विशेष -६.२३ लाख लिटरचा साठा -खाद्यतेलाच्या स्वस्ताईला आधार -आणखी सात जहाजे लवकरच येणार म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई जवळपास ६.२३ किलो मेट्रिक टन (सुमारे ६.२३ लाख लिटर) सूर्यफूल खाद्यतेलाचे जहाज रशियाहून भारताच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. हे जहाज बुधवारी रात्री सीरियात पोहोचले होते. आठवडाभरात ते नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर येण्याची अपेक्षा आहे. पुढील टप्प्यांत याच क्षमतेची सात जहाजे लवकरच भारताच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामुळे तेलदरांचा संभाव्य भडका टळण्याची शक्यता आहे. भारत हा जगात सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश आहे. परंतु भारताला एकूण देशांतर्गत मागणीच्या जवळपास ८० ते ८५ टक्के तेल आयात करावे लागते. त्यापैकी २२ टक्के तेल हे सूर्यफुलाचे असून ते युक्रेन व रशियाहून येते. हे सर्व तेल जहाजाने काळ्या समुद्रातून आणले जाते. रशियाने १५ फेब्रुवारीपासूनच काळ्या समुद्रात वर्चस्व निर्माण केल्याने त्यानंतर तेथून एकही जहाज रवाना झाले नव्हते. त्यानंतर युद्ध सुरू झाले. हे युद्ध अद्याप सुरू असल्याने तेलाच्या आयातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. युद्धस्थितीत खाद्यतेल आयात होत नसल्याने भारतात तेलाचे दर वाढू लागले आहेत. या स्थितीत अखेर एक जहाज रशियाहून रवाना झाल्याने ही आयात हळूहळू पूर्वपदावर येईल, अशी चिन्हे दिसत आहेत. '६ लाख लिटरहून अधिक तेल असलेले हे जहाज रशियाहून निघाले आहे. एवढेच नाही तर या जहाजाने बुधवार रात्रीपर्यंत ३० टक्के अंतर कापलेदेखील आहे. तेलाचा हा साठा किमान आठ ते दहा दिवसांसाठी मुबलक असेल. यामुळे टंचाईकडे जाणाऱ्या खाद्यतेलाला आधार होईल. तसेच वाढलेले दरदेखील किंचीत कमी होऊ शकतील, असा विश्वास आहे,' असे अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले. मोदी-पुतिन चर्चेनंतर... खाद्यतेलाची निर्यात सुरू करावी, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर केंद्रीय वाणिज्य व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही रशियाशी राजनैतिक चर्चा केली. या पार्श्वभूमीवर 'एमव्ही व्होल्गा रिव्हर' नावाचे हे जहाज क्रिमिया आणि रशियादरम्यान काळ्या समुद्रात असलेल्या कावकाझ या बंदरावरून निघाले आहे. सुएझ कालव्याद्वारे ते १५ ते १७ मार्चदरम्यान जेएनपीटीत दाखल होईल, अशी शक्यता आहे. यापाठोपाठ आणखी सात जहाजे एवढ्याच क्षमतेचे खाद्यतेल घेऊन भारताच्या दिशेने येण्यास सज्ज असून हा भारतासाठी मोठा दिलासा ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rfmzWCv

No comments