Header Ads

ad

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उभारी; २०२१-२२मध्ये विकास दरात १२. १ टक्क्यांनी वाढ

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना काळात केलेल्या प्रभावी उपाययोजना, टप्प्याटप्याने हटवलेले निर्बंध आणि करोना प्रतिबंधित लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे राज्यावरील करोनाचा झाकोळ दूर होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेने उभारी घेतली आहे. मागील २०२०-२१ या आर्थिक वर्षात ८ टक्के या दराने विकास दरात घट झालेली असताना आता त्याला मागे टाकत २०२१-२२ या आर्थिक वर्षात विकास दरात १२.१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला असून, या वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था रूळावर आल्याचेच राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२१-२२ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अहवाल मांडला. २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र समोर आल्याने राज्य सरकरला मोठा दिलासा मिळाला आहे. देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) ८.९ टक्के असताना व करोनाच्या हाहाकाराशी दोन हात करूनही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक दराने राज्याच्या सकल उत्पन्नात होत असलेली वाढ ही अत्यंत आशादायी असल्याचे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यातील कृषी क्षेत्रातील वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असून ती ११.७ टक्क्यांवरून ४.४ टक्के इतकी कमी झाली आहे. राज्यातील उद्योग क्षेत्राने मात्र भरारी घेतली आहे. गेल्या वर्षी उद्योग क्षेत्राची वाढ उणे ११.७ टक्के होती, ती यंदा ११.९ टक्के असल्याचे आर्थिक पाहाणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर सेवा क्षेत्रही उणे ९ टक्क्यांवरून १३.५ टक्क्यांनी वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे. अशी झाली वाढ कृषी क्षेत्र : ४.४ टक्के उद्योग क्षेत्र : ११.९ टक्के सेवा क्षेत्र : १३.५ टक्के औद्योगिक उत्पादन : ९.५ टक्के बांधकाम क्षेत्र : १७.४ टक्के


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bmk2HpO

No comments