मृताच्या मुलाकडून फौजदाराने दहा हजारांची लाच घेतली; पोलीस दलाची मान शरमेनने खाली घातली
औरंगाबाद : जिल्ह्यातील दौलताबादमध्ये एक चीड आणणारी आणि पोलीस दलाची मान शरमेनं खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांच्या झालेल्या अपघाताचा पंचनामा आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी मुलाकडून दहा हजार रुपयांची घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. रविकिरण आगतराव कदम ( ३९ ) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांचा दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीत अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे या अपघातप्रकरणी तक्रारदारास मोटार वाहन अपघात न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल करायचा आहे. त्यामुळे मयत वडिलांचा कोर्टात क्लेम दाखल करण्यासाठी अपघाताचा पंचनामा व इतर कागदपत्र देण्यासाठी तक्रारदार यांनी रविकिरण कदम यांच्याकडे मागणी केली होती. मात्र ते देण्यासाठी कदम यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १४ फेब्रुवारीला औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दिली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केली असता,कदम यांनी लाच मागितली असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत दौलताबाद पोलीस ठाण्यासमोरच कदम यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BuqOY6i
Post a Comment